रक्षाबंधन ..... कर्तव्याची जाणीव करून देणारा सण


रक्षाबंधन किंवा नारळी पौर्णिमा हा सण उत्तर-भारतात मोठ्‍या प्रमाणावर साजरा केला जातो. पूर्वी इतिहासात हा सण फक्त राजपूत लोक आणि उत्तर भारतीय प्रदेशात साजरा होत असे. पण हल्ली संपूर्ण भारतात हा सण साजरा केला जातो. इतिहासकालीन वाङमयात या बद्दल असे सांगितले जाते की पूर्वी राज्याच्या रक्षणाची जबाबदारी असणार्‍या राजाला म्हणजेच पर्यायाने प्रजेच्या रक्षणासाठी राजाला बद्ध करण्यासाठी त्याच्या हातात पांढरी मोहरी, सोने व तांदुळ यांची पुरचुंडी करून ती हातावर राखी मंत्रांचे उच्चारण करून मग बांधली जात असे. त्या काळी राजा हाच रक्षणकर्त्ता असल्याने त्याच्या रक्षणासाठी हे समंत्रक सुरक्षाकवच रक्षेच्या रूपाने त्याला बांधणे हे त्याच्यावरील प्रेम, आदर, तर व्यक्त करतेच पण त्याला कर्तव्याची जाणीवही करून देते.आज मात्र बहिणीने भावाला स्वत:च्या रक्षणासाठी बांधलेली राखी असा याचा अर्थ मानला जातो. भारतावर परकीय सत्तांनी विशेषत: मोगलांनी आक्रमण केले त्यावेळी त्यांच्या आक्रमणापासून स्वत:चा व आपल्या राज्यांचा बचाव करण्यासाठी राजपूत स्त्रियांनी आपल्या शेजारच्या राज्यातील राजांना राखी बांधण्यास सुरवात केली.याला उच्च नीचतेची उतरंड नव्हतीच पण जातीभेदाचीही तमा नव्हती. एका हिंदू राणीने आपल्या पतीपश्चात राज्याच्या रक्षणासाठी बाजूच्या मुसलमान राजाची मदत मागण्यासाठी राखीचा नजराणा पाठवला. त्या राजानेही हिंदू परंपरेचा मान ठेवून तिला आपल्या बहिणीचा दर्जा बहाल केला. हल्लीच्या धकाधकीच्या काळात लहानपणी चिंचा, बोरांवरून ते अगदी आईच्या बाजूला कोण झोपणार यावरून भांडणारे ताई-दादा आता परस्परांना ई-पत्र, फोन किंवा चॅटद्वारे भेटण्याचा व राखी पौर्णिमा एकत्र साजरा करण्याचा आनंद उपभोगतात.
द्रौपदीने आपल्या मानलेल्या भावाला (कृष्णाला) बांधलेली जरतारी शेल्याची चिंधी, गरीब बहिणीने भावाच्या हातात बांधलेला धागा किंवा शाळकरी ताईने तयार केलेली राखी, राजपूत रमणीने बाजूच्या राजाला पाठवलेले राखीचे ताट, श्रीमंत बहिणीने भावाला बांधलेली सोन्याची किंवा चांदीची राखी काय किंवा आज इंटरनेटच्या माध्यमातून बहिणीने भावाला पाठवलेली ई-शुभेच्छापत्रसहित राखी काय या सर्वांमागे भावना एकच आहे ती म्हणजे भावाबहिणींचे परस्परांवरील प्रेम। स्त्री कितीही मोठी, मिळवती झाली तरी तिच्या रक्षणाची जबाबदारी तिच्या भावावरच आहे हेच ती यातून त्याला सुचवू इच्छिते. यात तिचा दुबळेपणा नसून भावाच्या कर्तृत्वावरचा विश्वास दिसून येतो.रक्ताचे नाते असणारे भाऊ बहिण असोत किंवा मानेलेले असो, पण या नात्यामागची भावना पवित्र व खरी आहे. यात कुठेही फसवणूक नाही. त्या नात्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे राखी पौर्णिमा. त्यामुळेच तर भाऊ नसणारी स्त्री चंद्राला आपला भाऊ मानते व त्याला ओवाळते. अन् प्रत्येक आई आपल्या मुलाला चंदामामा म्हणूनच चांदोबाची ओळख करून देते. तूच आमचा त्राता, रक्षणकर्त्ता म्हणून देवालाही त्या दिवशी राखी वाहतात आणि उपयोगातल्या सगळ्या वस्तूंना देवराख्या बांधण्याची प्रथाही आढळते. आमच्या लहानपणी सकाळी अंघोळ करून आम्ही आमच्या उपाध्यायांपुढे उभे राहायचो अन् ते घरातल्या प्रत्येकाला मंत्र म्हणून हातात राखी बांधायचे. तेव्हा काही कळायचे नाही. पण आता वाटतंय की ते इतर सर्व व्याधींपासून आमचे रक्षण व्हावे या हेतूने हे अभिमंत्रीत सुरक्षाकवच हातात बांधत असावेत (हल्लीतर प्रत्येक तीर्थक्षेत्री हातात बांधायचे दोरे मिळतात.) असा हा दिवस अगदी लहानग्यांपासून ते वृद्धापर्यंत सर्वच जण आनंदाने साजरा करतात. हल्ली तर घरात एकच मुलगा/मुलगी असतांना ह्या राखीच्या निमित्ताने दोन परिवार एकमेकांच्या आणखीनच जवळ येत आहेत हे काय कमी आहे?आजही उत्तर-भारतात नोकर मालकाला राखी बांधतात व गरीब लोक धनवंतांना! यामागेही श्रेष्ठ व ज्येष्ठ लोकांनी व या सारख्या लोकांपासूनही रक्षणाची जबाबदारी आणि आपल्या कुटुंबीयांची जबाबदारी तुमच्यावरच आह हे ही सूचित होते.

रेशमी धाग्याला प्रेमाचा रंग .... रक्षाबंधन

घराच्या गच्चीत रूसून बसलेल्या आपल्या लहान बहिणीची समजूत घालण्यासाठी सर्वांत आधी जात असेल तर तो तिचा भाऊ! शाळेतून आपल्या मोठ्या ताईला आणण्यासाठी जाणार्‍या लहान भावाचा कोमल हात तिला संरक्षण देतो. अशा या बहिण-भावाचा रक्षाबंधनाचा सण त्यांच्या जीवनात रेशमी धाग्याला प्रेमाचा रंग देऊन जातो. लहान भावाच्या झालेल्या चुका स्वत:वर ओढवून घेणारी ताई आई-बाबाकडून मिळणारा 'प्रसाद' वाचविते. तर आपल्या ताईचे आभार मानण्यासाठी लहान भाऊ तिला आवडणारी वस्तू भेट देतो. शाळेच्या मुख्याध्यापिका पहिल्या इयत्तेत झोपलेल्या लहानग्याला घेऊन जायला सांगतात तेव्हा त्याची ताई शांत निजलेल्या आपल्या भावाला हळूवार आपल्या वर्गात घेऊन जाते आणि त्याला मांडीवर झोपवून फळ्यावरील लिहिलेले आपल्या वहीत उतरवून घेत असते. लहान श्रुती रडतच आपल्या मोठ्या भावाच्या वर्गात गेली व तिला चिडवणार्‍या तिच्या वर्गातील मुलांची नावे सांगायला लागली. तिचे डोळे पुसत मधल्या सुटीत त्यांना चांगला मार देऊ सांगताच छोट्या ताईचे रडणे एकदम बंद झाले व ती पुन्हा हसत खेळत आपल्या वर्गात जाऊन बसली. तिच्या मते मोठ्या भावाने दिलेले आश्वासन म्हणजे काम फत्ते असंच ती समजते. शाळेत जाणारी लहान बहिण हसण्या खिदळण्यात केव्हा मोठी होते कळतच नाही. मग तिला आपल्या बाईकवर घेऊन कॉलेजात सोडणारा तिचा भाऊ तिचा 'बॉडीगार्ड'च बनूनच जातो. तिच्या आवडीनिवडींची काळजी घेतो तर तिला संकटामधून आधार देतो. ताईचे लग्न होऊन तिला निरोप देण्याचा क्षण येतो, तेव्हा तिचा भाऊ पाहुण्यांच्या सरबराईत मग्न असतो. ताई विरहाने धाय मोकलून रडत असताना भावाला लहानपण आठवते. सरबराईत गुंतलेले हात घेऊन तोही अश्रूभरल्या डोळ्यांनी बहिणीला भेटतो. भाऊ व बहिणीचे नाते रेशमी धाग्यासारखे नाजूक असते. रक्षाबंधन या सणाला बहिण भावाच्या हातावर राखी बांधते व भाऊ तिला प्रेमाची भेटवस्तू देतो. एवढेच नाही तर तिच्या संरक्षणासाठी खंबीर आहे याची ग्वाहीही देतो. आपल्या देशात प्रेम, आपुलकी अजुनही कायम असल्याने रक्षाबंधन या सणाचे महत्त्व आजही कायम आहे.